विराट कोहली
क्रिकेटपटू / From Wikipedia, the free encyclopedia
विराट कोहली (५ नोव्हेंबर, इ.स. १९८८) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा एक खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे.[1] इएसपीएनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे.[2] इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे.
विराट कोहली | ||||
भारत | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | विराट प्रेम कोहली | |||
उपाख्य | चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली | |||
जन्म | ५ नोव्हेंबर, १९८८ (1988-11-05) (वय: ३५) | |||
दिल्ली,भारत | ||||
उंची | ५ फु ९ इं (१.७५ मी) | |||
विशेषता | फलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | उजखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
क.सा. पदार्पण (२६८) | २० जून २०११: वि वेस्ट इंडीज | |||
शेवटचा क.सा. | १ जुलै २०२२: वि इंग्लंड | |||
आं.ए.सा. पदार्पण (१७५) | २२ डिसेंबर २००८: वि श्रीलंका | |||
शेवटचा आं.ए.सा. | १७ जुलै २०२२: वि इंग्लंड | |||
एकदिवसीय शर्ट क्र. | १८ | |||
आं.टी२० पदार्पण (३१) | १२ जून २०१० वि झिंबाब्वे | |||
शेवटचा आं.टी२० | १० नोव्हेंबर २०२२ वि इंग्लंड | |||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
२००६-सद्य | दिल्ली | |||
२००८-सद्य | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | आं. टी२० | प्र.श्रे. | |
सामने | १०२ | २६२ | ११५ | ११८ |
धावा | ८,०७४ | १२,३४४ | ४,००८ | ९४८९ |
फलंदाजीची सरासरी | ४९.५३ | ५७.६८ | ५२.७३ | ५३.९१ |
शतके/अर्धशतके | २७/२८ | ४३/६४ | १/३७ | ३४/३० |
सर्वोच्च धावसंख्या | २५४* | १८३ | १२२* | २५४* |
चेंडू | १७५ | ६४१ | १५२ | ६४३ |
बळी | ० | ४ | ४ | ३ |
गोलंदाजीची सरासरी | - | १६६.२५ | ५१.०० | ११२.६६ |
एका डावात ५ बळी | - | ० | ० | ० |
एका सामन्यात १० बळी | - | ० | ० | ० |
सर्वोत्तम गोलंदाजी | - | १/१५ | १/१३ | २/४२ |
झेल/यष्टीचीत | १०२/- | १३८/- | ४१/- | ११३/- |
१७ नोव्हेंबर, इ.स. २०२२ |
दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २००८मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.[3][4] सुरुवातीला राखीव खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लवकरच भारताच्या मधल्या फळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला.[5] त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली[6]. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.[7] त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[8][9]
२०१२ मध्ये कोहलीची भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने अनेकदा कर्णधार महेन्द्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोनिने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.[10] २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.[11] आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.[12][13] विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हटले आहे.
कोहलीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू २०१२ आणि २०११-१२ व २०१४-१५ साठीचा बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूचा पुरस्कारसुद्धा समाविष्ट आहे. २०१३ मध्ये त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.[14] स्पोर्ट्सप्रो (SportsPro), नावाच्या एका इंग्लंडच्या मासिकाने २०१४ मध्ये कोहलीला दुसरा सर्वात उल्लेखनीय खेळाडू म्हणून उल्लेखले आहे.[15] ११ डिसेंबर २०१७ रोजी विराट कोहली सिने अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाहबद्ध झाला.