शरद ऋतूतील उत्सव आणि पूजाविधी From Wikipedia, the free encyclopedia
कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 'कोजागरी पौर्णिमा' बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते.[1][2] कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला 'माणिकेथारी' (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.[3]
पण हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते.[4]आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. [5] मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.[6]
कोजागिरी पौर्णिमेस होणाऱ्याप्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हणले आहे.[7] बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.[8]
सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।
परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् समर्पयामि।
या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.
या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.[9]
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची[10] आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते.[11][12] उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र,[13] बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.[14] दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.
ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी.[8]
विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा-अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते.[15]
पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो.[16][17] चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात.[18][19]श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात.[20][21][22] द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ)[23] भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे.[24][25][26]त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.[27]
मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात. दूध आटवून मध्यरात्री अगदी बाराचे चंद्रप्रकाशात ते सर्व जण प्राशन करीत असतात. चंद्रप्रकाशात असे आटवलेले दूध म्हणजे अमृतच होय. जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. अशी कथा आहे की रात्री १२ वाजता आश्विनी अप्सरा येऊन विचारतात, को जागर्ति? म्हणजे कोण जागे आहे? आणि जो जागा असेल त्याला त्या अमृत देतात. ही झाली कथा! पण त्यातील रहस्य काय असावे? जागृत कोण आहे? कोण जागतो? भगवंत गीतेत म्हणतात,
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी। यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः।। श्लोक ६९, अध्याय २
भौतिक लाभाकरिता सारेच जण जागृत असतात परंतु संयमी त्या लाभाकरिता झोपलेला असतो, म्हणजेच उदासीन असतो. परंतु ज्या अध्यात्म प्राप्तीकरिता इतर निद्रिस्त असतात, तेव्हा संयमी जागृत असतो. म्हणूनच कोण जागतो? को जागर्ति? जो संयमी साधक आहे तो! अशा साधकालाच अमृततत्व प्राप्त होत असते. को जागर्ति चा अपभ्रंश होऊन झाले कोजागिरी! [28]
या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.[29] उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात.
कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.[30] शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.[31][32]
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.[33] या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.[34]
या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा.[35] या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते.[36] घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते.[37] यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.[38] मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. (नवे (अनेकवचन नवी) म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.)
दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.[39] याच दिवशी वैदिक परंपरेतील देवता अश्विनीकुमार यांची प्रार्थना करून उत्तम आरोग्याची कामना केली जाते.[40]
भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते.[41] मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हे परंपरा आहे.[42]
कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्यात आग्रा येथील ताजमहाल पाहण्याची खास संधी पर्यटकांना उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी विशेष दरही आकारला जातो.[43]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.