![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/80/%25E0%25A4%25B6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE_%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258B%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25B0.jpg/640px-%25E0%25A4%25B6%25E0%25A5%258D%25E0%25A4%25AF%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AE_%25E0%25A4%25AE%25E0%25A4%25A8%25E0%25A5%258B%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25B0.jpg&w=640&q=50)
श्याम मनोहर
From Wikipedia, the free encyclopedia
श्याम मनोहर उर्फ श्याम मनोहर आफळे (२७ फेब्रुवारी, इ.स. १९४१:तासगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - )[1] हे मराठी भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी इ.स. २००८चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. काँपिटिशन ही त्यांची पहिली कथा.[2]
श्याम मनोहर आफळे | |
---|---|
![]() श्याम मनोहर | |
टोपणनाव | श्याम मनोहर |
जन्म | तासगाव |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, पत्रकारिता |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | कळ,उत्सुकतेने मी झोपलो,शीतयुद्ध सदानंद |
वडील | मनोहर आफळे |
पुरस्कार | साहित्य अकादमी |
श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुलीचे रहिवासी असून ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घर आहे.
श्याम मनोहर हे पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून २००१ साली निवृत्त झाले.
मनुष्य स्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते.त्यांनी ‘कादंबरी’ या वाड्मय प्रकाराची परिभाषाच बदलली, असे म्हटले जाते. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव्र जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या कादंबरीलेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणाऱ्या भाषेतून प्रकट करतात.[3]
श्याम मनोहर यांनी आठ लघुकथासंग्रह, आठ नाटके व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.