कळसूबाई शिखर
From Wikipedia, the free encyclopedia
कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात.
कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[1][2][3] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंगचा छंद असेल तर भेट द्यायला हे एक उत्तम ठिकाण आहे..