अक्षय्य तृतीया
भारतीय संस्कृतीतील महत्वाचा दिवस, साडे-तीन मुहूर्तांपैकी एक / From Wikipedia, the free encyclopedia
अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.[1] कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.[2] जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.[3][4] या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते.[5]
ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते.[6] या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.[7]