भारतीय राष्ट्रगीत From Wikipedia, the free encyclopedia
वंदे मातरम् (अर्थ: आई, मी तुला नमन करतो) [1] ही १८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली एक कविता आहे. त्यांनी ही कविता त्यांच्या १८८२ च्या आनंदमठ या बंगाली कादंबरीत समाविष्ट केली होती. [2] [3] ही कविता सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायली होती. [4] [5] ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटिश राजवट संपण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीने ऑक्टोबर १९३७ मध्ये या गाण्याचे पहिले दोन श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. [6] [7]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
ह्याचा भाग | आनंदमठ | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
लेखक | |||
वापरलेली भाषा | |||
प्रकाशन तारीख |
| ||
|
हे मातृभूमीचे स्तोत्र आनंदमठ या कादंबरीमध्ये बंगाली लिपीत लिहिले आहेत. [8] वंदे मातरम या शीर्षकाचा अर्थ "मातृभूमी मातेची मी स्तुती करतो" असा आहे. [5] [9] गाण्याच्या नंतरच्या श्लोकांमधील "माता देवी" चे वर्णन लोकांची मातृभूमी असे केले आहे – बंगमाता[10] [11] [12] [13] आणि भारत माता [14] [15]; परंतु मजकुरात याचा स्पष्ट उल्लेख नाही.
१८९६ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम राजकीय संदर्भात गायलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. [16] १९०५ पासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये हे लोकप्रिय मार्चिंग गाणे बनले. [5] आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादी आणि तत्वज्ञानी श्री अरबिंदो यांनी या गीताचा उल्लेख " बंगालचे राष्ट्रगीत" म्हणून केला. [17] या गाण्यावर आणि कादंबरीवर वसाहतवादी सरकारने बंदी घातली होती, परंतु कामगार आणि सामान्य जनता यांनी ही बंदी झुगारून दिली होती ( अनेकांना सार्वजनिक ठिकाणी हे गीत गाण्यासाठी वारंवार तुरुंगात टाकण्यात आले होते); १९४७ मध्ये देशाला वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने या गीतावरची बंदी हटवली. [18] [19]
२४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने "वंदे मातरम" हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. याप्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की, " जन गण मन " या भारताच्या राष्ट्रगीताच्या बरोबरीने या गाण्याचा देखील सन्मान केला पाहिजे." [20] तथापि, भारतीय राज्यघटनेत "राष्ट्रीय गीता"चा उल्लेख नाही. [21] [22]
या गाण्याचे पहिले दोन श्लोक हे आई आणि मातृभूमीचा अमूर्त संदर्भ आहेत, ते कोणत्याही हिंदू देवतेचा नावाने उल्लेख करत नाहीत. परंतु नंतरच्या श्लोकांमध्ये दुर्गासारख्या देवींचा उल्लेख आहे. [23] [24] या गाण्याच्या सादरीकरणासाठी परिस्थितीनुसार ६५ सेकंद अवधीचा तपशील आहे; परंतु "जन गण मन" या राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद हा कालावधी निश्चित आहे. [25]
भारताचा स्वातंत्र्य लढा १८५७ च्या सशस्त्र क्रांतीपासून सुरू झाला. हा लढा यशस्वी झाला नसला, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे सशस्त्र क्रांतीचे केंद्र बनले. सुखदेव, भगतसिंंग, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या झपाटलेल्या क्रांतिवीरांनी इंग्रजांविरुद्ध ही क्रांतीची मशाल तेवत ठेवली. परंतु ही क्रांती वैयक्तिक पातळीवर किवा छोट्या समूहापर्यंत मर्यादित होती. अठराशे सत्तरच्या दशकात एका वेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या म्हणजे १८८५ पूर्वीचा तो काळ होता. इंग्रजांचे कुटिल कारस्थान आणि जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली. अशा या वातावरणात वंदे मातरम् या गीताचा जन्म झाला.
कोलकाता विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून केली. नंतर ते कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. बंकिमचंद्र प्रखर देशभक्त होते. त्यांना मागील शतकातील संन्याशांचे बंड आणि १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यांचे फार आकर्षण होते. १८५७ साली इंग्रज सरकारने ‘गॉड सेव्ह दी क्वीन' हे ब्रिटिशांचे राष्ट्रगीत भारतात रुजू करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे राष्ट्रगीत भारताचेही राष्ट्रगीत आहे, अशी वातावरण निर्मिती करण्याकरिता कार्यक्रमात, सैन्यात आणि शाळांमध्ये त्यांनी हे गीत रुजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंकिमचंद्र खूप संतप्त झाले. सन् १८७६चा तो काळ होता. भारतीय लोक या ब्रिटिश राष्ट्रगीताचा तिरस्कार करीत होते. बंकिमचंद्रांनी या विषयावर गहन विचार केला. त्यांच्या लक्षात आले की गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत हा कधीच अखंड असा देश नव्हता आणि भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. म्हणून १८७६ मध्ये ७ नोव्हेंबरला त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करून तिचे नमन करणारे वंदे मातरम् हे सहा कडव्यांचे गीत लिहिले. आपल्या मित्रांना हे गीत वाचून दाखवल्यावर ते म्हणाले की, हे भारतीयांचे खरे राष्ट्रगीत असले पाहिजे. बंकिमचंद्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड' या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘आनंद मठ' ही कादंबरी इ.स. १८८२ साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले. या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरम् हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.[4]
‘आनंदमठ' या कादंबरीला अभूतपूर्व यश मिळाले व ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे वंदे मातरम् हे देशभक्तीचे अप्रतिम गीत लोकांपर्यंत पोहोचले आणि या गीताला खूप लोकप्रियता मिळाली. [26][27]१८९६ साली काँग्रेसच्या कोलकाता येथील राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गाऊन संपूर्ण अधिवेशन राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून टाकले. पुढे १९०१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्याला झाले असताना या अधिवेशनात श्री दखिना चरण सेन यांनी या गीताचा सामूहिक अभ्यास करून घेतला. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली. तरीसुद्धा बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात रवीन्द्रनाथ टागोर यांची पुतणी श्रीमती सरलादेवी यांनी हे गीत गायले. १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. ही घटना बंग-भंग(वंग भंग चळवळ) या नावाने इतिहासात नमूद आहे. बंग-भंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात वंदे मातरम् हे गीत प्रेरणादायी ठरले. हिदू-मुस्लिम सर्वांनी गायन केले. सर्वांनी एकजुटीने केलेल्या या उग्र आंदोलनामुळे इंग्रज सरकार हादरले आणि त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली.
१९०४ मध्ये मादाम कामा यांनी भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची पहिली रूपरेषा तयार केली. या झेंड्यात वर हिरवा, मध्य भागात पिवळा आणि खाली केसरी रंग होता. वर हिरव्या रंगावर कमळाची आठ फुले काढली असून, खालच्या केसरी रंगावर सूर्य आणि चंद्राच्या आकृत्या काढल्या होत्या. मध्य भागातील पिवळ्या रंगावर वंदे मातरम् असे लिहिले. वंदेमातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतका प्रेरक बीज मंत्र होता. मादाम कामा यांनी याला नियोजित राष्ट्रीय ध्वजाच्या मध्य भागात ठळकपणे स्थान दिले. १९०७ मध्ये त्यांनी वंदे मातरम् लिहिलेला हा ध्वज बर्लिन येथे फडकविला.
वंदे मातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र होता. लाला लजपतराय यांनी त्या काळात लाहोरहून एक पाक्षिक काढले, त्याचे नाव होते ‘वंदे मातरम्.' हिरालाल जैन यांनी १९०५ मध्ये भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला व त्याचा शेवट वंदे मातरम् या गीताने केला.
१९१५ पासून काँग्रेसच्या प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनात नियमितपणे आग्रहपूर्वक वंदे मातरम् गायन होऊ लागले. त्यावेळी वंदे मातरम् इस्लामविरोधी नव्हते की जातीयही नव्हते. हिदू-मुस्लिम सर्वजण सारखेच वंदे मातरम्चा जयघोष करीत होते. अनेक क्रांतिकारक इंग्रजांचे अत्याचार सहन करत व वंदे मातरमचा जयघोष करत फासावर गेले. स्वातंत्र्य आंदोलनात वंदे मातरम् हा अतिशय लोकप्रिय असा जयघोष होता. कोणत्याही मोर्चामध्ये ‘भारत माता की जय' आणि ‘वंदेमातरम्' हे जयघोष असायचे.
१९३७ मध्ये राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसने प्रतिपादन केले की वंदे मातमच्या सहा कडव्यांपैकी पहिल्या दोन कडव्यांमध्ये देशाला मातृभूमी म्हणत देशाच्या सृष्टिसौंदर्याचे वर्णन केले असल्यामुळे त्यात मूर्तिपूजेचा काहीही संबंध येत नाही. परंतु शेवटच्या चार कडव्यांमध्ये काही ठिकाणी मातृभूमीचे हिदूंची देवी दुर्गेच्या रूपात वर्णन केले आहे. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने वंदे मातरम् गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला व तो मंजूर पण झाला. परंतु १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस प्रणीत भारत सरकारने फक्त ‘जन गण मन' या गीतालाच राष्ट्रगीत म्हणून घोषित केले. वंदे मातरम्ची अवहेलना करणारी ही गोष्ट अनेक नेत्यांना पटली नाही. घटना समिती गठित झाल्यावर वंदेमातरम् याला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यावर अनेकदा चर्चा झाली.अखेर घटना समितीचे अध्यक्ष देशभक्त डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी घटना लागू होण्याच्या दोन दिवसापूर्वी २४ जानेवारी १९५०ला घटना समितीत हा ठराव मान्य करवून घेतला. अशा प्रकारे वंदे मातरम्ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला.[28] ७ सप्टेंबर १९८१ला या राष्ट्रगीताची शताब्दी संपूर्ण देशात उत्साहात साजरी करण्यात आली. ७ सप्टेंबर २००६ मध्ये या राष्ट्रगीताला १२५ वर्षे झाल्याबद्दल या गीताच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवाचे समारंभ झाले.२२ ऑगस्ट २००६ रोजी युपीए सरकारने संसदेत घोषणा केली की शाळांमध्ये७ सप्टेंबर रोजी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत गाणे ऐच्छिक राहील. भारतीय जनता पार्टीने शाळांमधून हे राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य केले पाहिजे, अशी जोरकस मागणी केली. परंतु युपीए सरकारने ही मागणी मान्य केली नाही. या दिवशी देशभरातील शाळांमध्ये हे राष्ट्रगीत अतिशय उत्साहाने गायिले गेले आणि अनेक मुस्लिम संस्थांनी याला समर्थन दिले.
‘जन गण मन' या राष्ट्रगीताची एकच धून असून, त्याप्रमाणेच या राष्ट्रगीताचे गायन होत असते. परंतु वंदेमातरम्च्या अनेक धून प्रचलित आहेत. सर्वप्रथम १८८२ मध्ये आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् या गीताचा समावेश केल्यावर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्या काळातील बंगाली नाट्य क्षेत्रातील लोकप्रिय संगीतकार जदुनाथ भट्टाचार्य यांच्याकडून वंदे मातरम्ची चाल बसवून घेतली. ही चाल अनेक वर्षे प्रचलित होती. विसाव्या शतकामध्ये या गीताच्या ज्या चाली प्रचलित झाल्या, त्यापैकी अनेक चाली भारतीय संगीताच्या रागांवर लावल्या गेल्या. काही चित्रपटांमध्ये निरनिराळ्या चालींवर हे गीत चित्रित केले गेले. यापैकी ‘आनंद मठ’, ‘लीडर' आणि ‘अमर आशा' या चित्रपटांच्या चाली लोकप्रिय झाल्या. आनंदमठ या चित्रपटात वंदे मातरम् हे गीत लता मंगेशकर यांनी एका प्रसंगात गायिले आहे. दुस-या एका प्रसंगात हेमंतकुमार यांनी हे गीत गायिले आहे. लोकप्रिय संगीतज्ञ रविशंकर यांनी आकाशवाणीकरिता या गीताची जी चाल लावून दिली, ती पण खूप लोकप्रिय झाली. १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी लोकप्रिय संगीतकार ए. आर्. रहमान यांनी ‘वंदे मातरम्' हे शीर्षक असलेला गीत संग्रह प्रकाशित केला. तो लोकांना खूप आवडला. २०१८ मधे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कल्याणी बोंद्रे यांनी ‘वंदे मातरम्' या गीताला नवीन चालीत बांधून हे गीत रसिकांसमोर आणले त्याला देखील रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, २००२ मध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने जगातील ७००० गीते निवडून सर्वात लोकप्रिय अशा पहिल्या १० गीतांकरिता एक सर्वेक्षण केले. त्यात ए.आर. रहमानच्या वंदे मातरमला जगात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान लाभले. रविशंकर व ए.आर. रहमान यांनी बनवलेल्या चाली भारतीय संगीताच्या देस या रागावर आधारित आहेत. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत आजही लोकप्रिय आहे.
"साप्ताहिक विवेक‘तर्फे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या १७५व्या जयंती निमित्ताने "वंदे मातरम्‘ या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पु.सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते १६ डिसेंबर २०१४ रोजी झाले. या ग्रंथात वंदे मातरम्चा इतिहास, त्याविषयी छापून आलेले लेख या सर्वांचे संकलन मिलिंद सबनीस यांनी केले आहे. डॉ. आनंद हर्डीकर हे "समग्र वंदे मातरम्‘ या प्रकल्पाचे संपादक सल्लागार होते.
गीतकार: बंकिमचंद्र चॅटर्जी
रचना वर्ष: इ.स. १८७६
प्रकाशन वर्ष: इ.स. १८८२
वन्दे मातरम्
वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।
कोटि - कोटि - कण्ठ कल - कल - निनाद - कराले,
कोटि - कोटि - भुजैर्धृत - खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।
तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं ही प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
मातरम् वन्दे मातरम् ।
त्वम् ही दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।
श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम् ॥ ५ ॥
वन्दे मातरम् ।
-बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी)
===
'आनंदमठ' लिहिण्यापूर्वी पाच वर्षे, कार्तिक शु. ९, १७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकीमचंद्र चटर्जींनी लिहिलेले हे गीत जणू 'आनंदमठ' कादंबरीसाठीच लिहिले असावे इतके चपखल बसले आहे.
===
संदर्भ-
"आनंदमठ - आक्षेप आणि खंडन"
लेखक - मिलिंद प्रभाकर सबनीस
प्रकाशक - जन्मदा प्रतिष्ठान
प्रकाशन - २६ जानेवारी २००६
आई तुला प्रणाम
आई तुला प्रणाम ॥ धृ ॥
सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू ।
हरीतशस्यावृत्त तू ॥
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी ।
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते ॥
सुहासिनी, सुमधूर भाषिणी ।
सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥ आई, तुला प्रणाम
कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू ।
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू ॥
अबला कशी? महाशक्ती तू ।
अतुलबलधारिणी ॥
प्रणितो तुज तारिणी ।
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥ आई, तुला प्रणाम
तू विद्या, तू धर्म ।
तू हृदय, तू मर्म ॥
तूच प्राण अन् कुडीही ।
तूच मम बाहूशक्ती ॥
तूची अंतरीची भक्ती ।
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी ॥
तुला प्रणाम ।
आई तुला प्रणाम ॥ ३ ॥ आई, तुला प्रणाम
तूची दुर्गा, दशप्रहरणधारिणी ।
कमला, कमलदल विहारिणी ॥
वाणी, विद्यादायिनी ।
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम ॥
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई ।
आई तुला प्रणाम ॥
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते ।
तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ४ ॥ आई तुला प्रणाम
===
मराठी रूपांतर - श्री. नरेंद्र गोळे
दिनांक - ८ ऑगस्ट २००६
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.