From Wikipedia, the free encyclopedia
चिंतामणराव गणेश कोल्हटकर ( मार्च १२ इ.स. १८९१ - नोव्हेंबर २३ इ.स. १९५९ ) हे मराठी गद्यनट आणि नाट्यनिर्माते होते.
चिंतामण गणेश कोल्हटकर | |
---|---|
जन्म |
चिंतामण गणेश कोल्हटकर मार्च १२ इ.स. १८९१ सातारा, महाराष्ट्र |
मृत्यू | २३ नोव्हेंबर १९५९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय, वृत्तपत्रलेखन, अन्य लेखन आणि नाट्यनिर्मिती |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९१४-इ.स. १९५९ |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके |
पुण्यप्रभाव राजसंन्यास भावबंधन |
पुरस्कार | रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक, साहित्य अकादमी पुरस्कार |
वडील | गणेश |
अपत्ये | चित्तरंजन कोल्हटकर |
चिंतामणराव कोल्हटकर यांचे घराणे नेवरे या रत्नागिरी जिल्ह्यातील गावचे होते. त्यांचा जन्म तेथेच १२ मार्च, इ.स. १८९१ रोजी झाला. त्यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली.
सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले आणि १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्भुत असाच आहे.
कोल्हटकर इ.स. १९११मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. इ.स. १९१४ मध्ये ते किर्लोस्कर नाटक मंडळी. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक प्रकारची कामे केली.
कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले.
राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या आणि गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला.
इ.स. १९३३च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला.[ दुजोरा हवा] तेव्हा चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना (इ.स. १९४२) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली.
चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्चर्समध्ये रूपांतर केले.पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेऱ्या, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपटव्यवसायतून तावून सुलाखून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले.
चिंतामणरावांनी पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले. अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले.[ दुजोरा हवा]
कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते.[ संदर्भ हवा ] त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या माझे नाटककार या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक इ. स. १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला.
त्यांचा मुलगा चित्तरंजन कोल्हटकर हेसुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणरावांची नात आणि चित्तरंजन कोल्हटकर यांची ज्येष्ठ कन्या, विनीता करमरकर यांनी चिंतामणरावांचे चरित्र लिहिले आहे.
विश्राम बेडेकर, पु.ल. देशपांडे, चंद्रकांत गोखले, वसंत शिंदे, शांता जोग हे सर्व चिंतामणराव कोल्हटकरांचे नाट्यक्षेत्रातले शिष्य पुढे नावारूपाला आले.
चिंतामणराव कोल्हटकर हे इ.स. १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५व्या, आणि इ. स. १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते.
त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला.
चिंतामणरावांनी लिहलेल्या 'बहुरुपी' नामक आत्मचरित्राला १९५८सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला
Seamless Wikipedia browsing. On steroids.