गणपतीपुळे पासून थोड्या अंतरावर असलेला किल्ला From Wikipedia, the free encyclopedia
जयगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[1]
जयगडाचा किल्ला पठारावर आहे. हे पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजूंना सागराने घेरलेले आहे. येथेच शाल्मीही नदी सागराला येऊन मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षित असे बंदर म्हणून जयगड पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.
जयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. जयगड गावात जाणाऱ्या फाट्यावरून आपण पाच मिनिटांत जयगड बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो.
मुंबई-पणजी महामार्गावरील संगमेश्वर हे गाव ओलांडल्यावर घाटाच्या माथ्यावर निवळी फाटा लागतो. येथून जयगडाला अथवा गणपतीपुळे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. तसेच रत्नागिरीकडून गणपतीपुळे-मालगुंड मार्गेही जयगड गाठता येतो. वैशिष्टपूर्ण निसर्गसौंदर्य जयगड किल्ल्याला लाभलेले आहे. कोकण किनारपट्टी व निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकण परिसरामध्ये मोठ्या दिमाखात जयगड किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे.
किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. हा किल्ला विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८० च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून जयगड किल्ला ओळखला जातो. निसर्गसंपन्न आणि सौंदर्य हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे
सध्या या बालेकिल्ल्याचा संपूर्ण परिसर तारेची जाळी लावून संरक्षित केलेला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर सात-आठ फूट खोलीचा खंदक आहे. हा कातळकोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनविलेला नाही. त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. शत्रू तटाला येऊन भिडू नये म्हणून हा खंदक बालेकिल्ल्या भोवती खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळला घालून गेलेला खंदक पार खालपर्यंत नेलेले आहे. उजवीकडील बाजुला खंदकाला एक प्रवेशद्वारही केलेले आहे. खंदकाला प्रवेशद्वार असलेली ही रचना वेगळ्या प्रकारची आहे.
किल्ल्यावर दोन बुरुजांमधे लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पूर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक उत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे.
दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी असे मार्ग केलेले आहेत. तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काहीजण याला कान्होजी आंग्रे यांचा वाडा असेही म्हणतात.
या वाड्याशेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे. मात्र ती झाडीझुडूपांनी पूर्णपणे झाकली गेली आहे. बाजूलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळेजवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलीदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती. तटबंदीच्या नरबळीसाठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमध्ये जिवंत चिणून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबाच्या ह्या त्यागपूर्ण बलिदानामुळे तटबंदी उभी राहीली. म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिद्ध आहे.
तटबंदीवरून पूर्ण गडफेरी करता येते. गडावरून समुद्राचे दृश्य उत्तम दिसते. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामध्ये जागोजागी माऱ्याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते, मात्र तोफा आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास दीड-तासाचा अवधी पुरेसा आहे. दरवाजाच्या बाहेरील खंदकामधील दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायऱ्या आहेत. येथून खालच्या भागात जाता येते. खाली जांभ्या दगडात कोरलेली गुहा आहे. या गुहेत मोहमाया देवीचे मंदिर असून ही ग्रामस्थ असलेल्या घाटगे यांची कुलदेवता आहे. समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरूजही पाहायला मिळतात. समुद्राकाठच्या पडकोटाचा भाग पाहून आपण डांबरी वाटेने धक्क्याकडे येवू शकतो व येथून आपण करहाटेश्वर मंदिराकडेही जावू शकतो.
गडावर राहायची सोय नाही. येथून जवळच असलेल्या मालगुंड आणि गणपतीपुळे ह्या गावी राहण्याची सोय आहे. तेथून अर्ध्या तासाच्या अंतरावर हा किल्ला आहे.
जयगड हा कमी उंची असलेला गड असला तरी देखील तेथे तात्काळ पाणी उपलब्ध होत नाही. तरी आपण आपल्या सोबत पाणी व जेवणासाठी डबा असू द्यावा.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.