आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक (पूर्वी आयसीसी विश्व ट्वेन्टी२० म्हणून ओळखली जात असे)[4] ही ट्वेंटी२० क्रिकेटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्रिकेटची प्रशासकीय संस्था, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सध्या १६ संघांचा समावेश आहे, ज्यामध्ये दिलेल्या अंतिम मुदतीनुसार क्रमवारीतील अव्वल १० संघ आणि टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे निवडलेल्या सहा संघांचा समावेश आहे.
आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक | |
---|---|
चित्र:ICC Men's T20 World Cup Trophy.webp टी२० विश्वचषक | |
आयोजक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती |
प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
प्रथम | २००७ |
शेवटची | २०२२ |
स्पर्धा प्रकार | साखळी सामने व बाद फेरी |
संघ |
१६ २० (२०२४ पासून)[1] |
सद्य विजेता | ऑस्ट्रेलिया (१ले विजेतेपद) |
यशस्वी संघ | वेस्ट इंडीज (२ वेळा) |
सर्वाधिक धावा | महेला जयवर्धने (१०१६)[2] |
सर्वाधिक बळी | शाकिब अल हसन (४१)[3] |
सदर स्पर्धा साधारणतः दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. तथापि, स्पर्धेची २०२० आवृत्ती २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती, परंतु कोविड-१९ मुळे, स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आणि यजमानपद भारताकडे सोपविण्यात आले. २०१६ नंतर तब्बल पाच वर्षांनी २०२१ मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. तथापि, भारतातील कोविड-१९ महामारीमुळे, सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमान येथे हलविण्यात आले.[5] मे २०१६ मध्ये, आयसीसीने २०१८ मध्ये एक स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना पुढे आणली, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका संभाव्य यजमान असणार होता.[6] परंतु २०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समारोपाच्या वेळी, आयसीसीने २०१८ आवृत्तीची कल्पना वगळली.[7]
आतापर्यंत सात स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत आणि केवळ वेस्ट इंडीजने एक पेक्षा अधिक वेळा स्पर्धा जिंकल्या आहेत. २००७ वर्ल्ड ट्वेंटी२०ची पहिलीवहिली स्पर्धा, दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती, आणि स्पर्धेचे विजेतेपद भारतीय संघाने मिळवले होते, त्यांनी जोहान्सबर्ग येथील वॉंडरर्स मैदानावर अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. २००९ ची स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली आणि ती आधीच्या उपविजेत्या पाकिस्तानने जिंकली, ज्याने लॉर्ड्सवर अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला. तिसरी स्पर्धा २०१० मध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याचे आयोजन वेस्ट इंडीज बनवणाऱ्या देशांनी केले होते. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. चौथी स्पर्धा, २०१२ विश्व ट्वेंटी२०, प्रथमच आशियामध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले गेले. २००४ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकताना वेस्ट इंडीजने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला.[8] पाचवी स्पर्धा, २०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२०, बांगलादेशने आयोजित केली होती, आणि श्रीलंकेने भारताचा पराभव करून जिंकली होती, तीन फायनलमध्ये खेळणारा श्रीलंका हा पहिला संघ होता. सहावी स्पर्धा, २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०, भारताने आयोजित केली होती आणि वेस्ट इंडीजने इंग्लंडला हरवून जिंकली होती. ऑस्ट्रेलिया हे सध्याचे टी२० विश्वचषक विजेते आहेत, त्यांनी २०२१ च्या अंतिम सामन्यात न्यू झीलंडचा पराभव करून त्यांचे पहिले विजेतेपद पटकावले होते.