महात्मा फुले
भारतीय समाजसुधारक / From Wikipedia, the free encyclopedia
जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.[1][2] सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.[3]
महात्मा जोतीराव फुले | |
---|---|
टोपणनाव: | जोतीबा, महात्मा |
जन्म: | ११ एप्रिल, १८२७ कटगुण, सातारा |
मृत्यू: | २८ नोव्हेंबर, १८९० (वय ६३) पुणे, महाराष्ट्र |
संघटना: | सत्यशोधक समाज |
प्रमुख स्मारके: | भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे |
धर्म: | हिंदू |
प्रभाव: | थॉमस पेन आणि लहुजी वस्ताद साळवे |
प्रभावित: | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
वडील: | गोविंदराव शेरीबा फुले |
आई: | चिमणाबाई फुले |
पत्नी: | सावित्रीबाई फुले |
अपत्ये: | यशवंत फुले (दत्तक) |
महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.[3][4] जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.[5] खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.[6][7]
महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.