कारगिल युद्ध
भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सन १९९९ / From Wikipedia, the free encyclopedia
कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत-पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. सन १९९९च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.
दिनांक | ३ मे १९९९-२६ जुलै १९९९ (२ महिने, ३ आठवडे, २ दिवस) |
---|---|
स्थान | कारगिल जिल्हा व द्रास जिल्हा , जम्मू आणि काश्मीर, भारत |
परिणती | निर्णायक भारतीय विजय
घुसखोरांनी ताब्यात घेतलेला प्रदेश भारताला पुन्हा मिळवण्यात यश. |
प्रादेशिक बदल | नाही |
युद्धमान पक्ष | |
---|---|
भारत | पाकिस्तान, मुजाहिदीन |
सेनापती | |
के. आर्. नारायणन् (भारताचे राष्ट्रपती) अटल बिहारी वाजपेयी (भारताचे पंतप्रधान) जनरल वेद प्रकाश मलिक (भूदलप्रमुख) ले. जनरल चंद्र शेखर (उपभूदलप्रमुख) एर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस (वायुसेनाप्रमुख) |
मुहम्मद रफिक तरार (पाकिस्तानचे राष्ट्रपती) नवाझ शरीफ (पाकिस्तानचे पंतप्रधान) जनरल परवेझ मुशर्रफ (भूदलप्रमुख) |
सैन्यबळ | |
३०,००० | ५,००० |
बळी आणि नुकसान | |
भारताकडून अधिकृत आकडे ५२७ ठार[1][2][3] १,३६३ जखमी[4] १ युद्धकैदी |
पाकिस्तानातील विविध स्रोतांकडील अंदाज ३५७ (मुशर्रफ) ते ४०० (शरीफ) ठार[5][6] ६६५+ जखमी [5] ८ युद्धकैदी.[7] |
हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले होते. परंतु भारताने हे युद्ध कारगिलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच (ऑक्टोबर, १९९९मध्ये) पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली. कारगिल युद्ध भारताने जिंकले.