स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन किंवा आझादी का अमृत महोत्सव हा एक आगामी कार्यक्रम आहे, ज्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे.[1]
भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.[2][3]
औपचारिकप्रथेप्रमाणे भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज फडकवतील आणि त्यानंतर भाषण देतील.[4]
भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशदेखील त्यांच्या स्थानिक पातळीवर हा उत्सव गावोगावी साजरा करतील. महाराष्ट्रातील ठाणे शहरात अमृत महोत्सवाची स्वतःची संकल्पना तयार केली आहे, जी १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवली जाईल. या उत्सवांमध्ये प्रत्येक राज्यातील विविध शहरात विविध कार्यक्रम, उत्सव, विविध रॅली, सामुदायिक कार्निव्हल इत्यादींचा समावेश आहे. ३१ जुलै २०२२ रोजी 'मन की बात' मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरमयान आपले सोशल मीडिया प्रोफाइल चित्र बदलून भारताच्या ध्वजासह लावण्याचे आवाहन केले आहे.[5][6][7]
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनाच्या आधी शाळा आणि महाविद्यालये यांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रभातफेरी, विविध स्पर्धा, देशभक्तीप्र गीत गायन, युवकांसाठी 'बढे चलो' अभियान असे विविध उपक्रम घेऊन देशाप्रती आदर व्यक्त करण्याची संधी घेतली जात आहे.[8][9]
धरणाचे पाणलोट क्षेत्र, विविध मंदिरे, कार्यालये अशा ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास किंवा सुशोभन करून उत्सव साजरा केला आहे.[10][11]
मोठी शहरे तसेच लहान गावांमध्ये रोषणाई, आतषबाजी, वैचारिक व्याख्याने, स्पर्धा, ध्वजवंदन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.[12]
स्वातंत्र्यलढयाचा इतिहास माहिती होण्यासाठी विविध संग्रहालये, अभिलेखागार यांनीही प्रदर्शनाचे सादरीकरण करून जनतेला माहिती देण्याचा उपक्रम राबविला आहे.[13]
भारत सरकारने हर घर तिरंगा (प्रत्येक घरात तिरंगा) ही मोहीम देखील सुरू केली आहे. यात प्रत्येक घरामध्ये ₹२५ च्या अनुदान दराने २०x३० इंच आकाराचा राष्ट्रध्वज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रत्येकाने आपल्या घरात अथवा कार्यालयात, संस्थेत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात भारताचा राष्ट्रध्वज फडकवत ठेवणे असे या अभियानाचे स्वरूप आहे.[14]
भारत देशाच्या बाहेर असलेल्या विविध देशातील भारतीय दूतावास तसेच भारतीय नागरिक यांनी या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत स्थानिक पातळीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संगीताचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, चित्र प्रदर्शन अशा विविध माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाचा आनंद साजरा केला जात आहे.[15]
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महौत्सवानिमित्त शाळेची प्रभातफेरी