From Wikipedia, the free encyclopedia
नारायण सीताराम फडके (जन्म : ४ ऑगस्ट १८९४; मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठराविक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत.
फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत.
त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत.
त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपटही निघाला होता.
रत्नागिरी येथे १९४० साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. १९६२ साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्यांचा नावाचा पुरस्कार दरवर्षी एका उत्तम साहित्यकृतीला देण्यात येतो.
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
अखेरचे बंड | कादंबरी | दुसरी आवृत्ती १९४४ | |
अटकेपार | कादंबरी | १९३१ | |
अल्ला हो अकबर ! | कादंबरी | १९१७ | |
असाही एक त्रिकोण ! | कादंबरी | १९७४ | |
इंद्रधनुष्य | |||
उजाडलं पण सूर्य कोठे आहे? | १९५० | ||
उद्धार | कादंबरी | १९३५ | |
ऋतुसंहार | १९५८ | ||
एक होता युवराज | १९६४ | ||
कलंकशोभा | कादंबरी | १९३३ | |
कलंदर | कादंबरी | ||
किती जवळ किती दूर | कादंबरी | १९७२ | |
कुहू ! कुहू ! | १९६० | ||
कुलाब्याची दांडी | कादंबरी | १९२५ | |
गुजगोष्टी | लघुनिबंध संग्रह | १९३३ | |
जादूगार | कादंबरी | १९२८ | |
झंझावात | कादंबरी | १९४८ | |
झेलम | कादंबरी | १९४८ | |
दौलत | कादंबरी | १९२९ | |
धूम्रवलये | लघुनिबंध संग्रह | १९४१ | |
नव्या गुजगोष्टी | लघु्निबंध संग्रह | १९३७ | |
निबंध सुगंध | लघुनिबंध संग्रह | ||
निरंजन | कादंबरी | १९३२ | |
पाप असो पुण्य असो | |||
प्रतिभासाधन | वैचारिक | ||
प्रवासी | १९३७ | ||
बावनकशी | लघुकथासंग्रह | १९६२ | |
भोवरा | कादंबरी | ग.पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई४ | द्वितीयावृत्ति १९७३ |
लग्नगाठी पडतात स्वर्गात | |||
लहरी | |||
वेडे वारे | |||
सरिता सागर | |||
साहित्यगंगेच्या काठी | |||
हिरा जो भंगला | |||
ही का कल्पद्रुमांची फळे ? | १९६१ | ||
हेमू भूपाली | १९७८ | ||
प्रा.फडके यांच्या ७८ व्या वाढदिवसी ४-८-१९७२ रोजी प्रकाशित झालेल्या "किती जवळ किती दूर" या ६५ व्या कांदबरीच्या मलपृष्टावर "परचुरे प्रकाशन मंदिर मुंबई ४" यांनी प्रा. फडके यांच्या प्रकाशित केलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे, ती अशी-१] बासरी २]बहार ३]राहिले ते गंगाजळ ४] जखम ५] स्वप्नांचे सेतू ६] अमृताने पैजासि जिंके ७] चांदणी ८] तू कशी! ती कशी ! ९] आपलेच दांत ! आपलेच ओठ ! १०] भोवरा ११] ही कल्पद्रुमाचीं फळें १२] त्रिवेणी १३] काळे ढग ! रुपेरी कडा १४]धोका १५] ऋतुसंहार १६]कुहू!कुहू! १७] कठपुतळी १८] निर्माल्य १९]एक होता युवराज २०]मन शुद्ध तुझं २१] तरंग २२]चाहूल २३] उजाडलं ! पण सूर्य कुठें आहे ? २४]कुणि कोडं माझं उकलिल कां ? २५]पाप असो ! पुण्य असो ! २६] पुरुषजन्मा ही तुझी कहाणी ! २७] किती जवळ किती दूर. आणि ४-८-१९७४ला परचुरे प्रकाशनाने "असाहि एक त्रिकोण " ही ६९ वी कादंबरी प्रकाशित केली.
१९२० च्या दशकात फडक्यांनी भारताची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जन्मदर नियंत्रण आणि युजेनिक्स (Eugenics) यांचे जोरदार समर्थन केले. १९२७ मध्ये त्यांनी 'भारतातील लैंगिक समस्या' या विषयावर प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी अमेरिकेतील कुटुंब नियोजनाच्या सुप्रसिद्ध समर्थक, श्रीमती मार्गारेट सेंगर ह्यांनी प्रस्तावना लिहिली होती. [1] Birth Control Review नावाच्या नियतकालिकात देखील ह्या विषयावरील त्यांचे लेख प्रसिद्ध झाले होते.[2]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.