पंजाबमधील गाव, भारत From Wikipedia, the free encyclopedia
खेमकरण (पंजाबी:ਖੇਮਕਰਨ ) हे भारताच्या पंजाब राज्यातील तरण तारण जिल्ह्यातील एक गाव आहे. इ.स. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान येथे भारत व पाकिस्तानाच्या सैन्यांच्या रणगाड्यांच्या तुकड्यांमध्ये तुंबळ लढाई झाली. या लढाईमुळे याचे नाव रणगाड्यांची दफनभूमीअसे पडले[1].
इ.स. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे रणगाड्यांचे एक प्रमुख युद्ध होते. या युद्धामुळे, युद्ध झालेल्या स्थानी म्हणजेच खेमकरण येथे 'पॅटन नगर'ची स्थापना झाली. याचे कारण म्हणजे पाकिस्तानी सैन्याने वापरलेले पॅटन रणगाडे या ठिकाणी काबीज केले गेले अथवा निकामी केले गेले.
खेमकरण हे 31.16°N 74.66°E.[2] येथे वसलेले आहे.
शिखांचे नववे गुरू तेगबहादूरसिंग (इ.स. १६२१ - इ.स. १६७५), यांनी खेमकरण येथे भेट दिली. त्यांनी तेथे वास्तव्य केले व गुरू गोविंदसिंग यांचे स्मृत्यर्थ तेथे एक विहिर बांधली.
इ.स. १९४७ साली ब्रिटिश भारताची भारत व पाकिस्तान अश्या दोन देशांमध्ये फाळणी होण्यापूर्वी खेमकरण हे पंजाब प्रांताच्या लाहोर जिल्ह्यात होते.
इ.स. १९६५ साली तेथे एक गुरुद्वारा होता. पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करून ते गाव काबीज केले. तेथील रहिवाश्यांनी पळ काढला. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात हा ऐतिहासिक गुरुद्वारा उद्ध्वस्त झाला. नंतर तेथे भारतीय सैन्य पोचले. त्यांनी पाक सैन्यास मागे हुसकावले व लढाईत जय मिळवला. भारतीय सैन्याने त्या गुरूद्वाऱ्याचे नूतनीकरण व दुरुस्ती केली.
इ.स. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दोन्ही देशांच्या पश्चिमेकडील सामाईक सीमेवर युद्ध झडले. या युद्धात दोन्ही बाजूंच्या सुमारे १००० रणगाड्यांनी भाग घेतला. या युद्धाच्या आरंभी भारतीय सैन्यात एक सशस्त्र तुकडी (आर्म्ड डिव्हिजन) होती, तसेच पायदळाच्या सहा रेजिमेंट सहाय्य करीत होत्या. पाकिस्तानी सैन्याकडे दोन सशस्त्र तुकड्या तसेच तत्कालीन रणगाड्यांमध्ये सर्वांत आधुनिक गणले जाणारे एम-४८ पॅटन रणगाडे होते. भारतापाशी त्याचे समकक्ष रणगाडे होते; परंतु ते फक्त चार रेजिमेंटींपुरते मर्यादित होते.
खेमकरणजवळ भिखीविंड गावाजवळ एका जमिनीच्या तुकड्याला पॅटन नगर असे म्हणण्यात येत होते.[3] युद्ध संपल्यावर सप्टेंबर, इ.स. १९६५ चे दरम्यान पाक लष्कराचे सुमारे ६० रणगाडे येथे प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले होते. असल उत्तरची लढाई या दरम्यान हे रणगाडे भारतीय सैन्याने काबीज केले होते. ते येथे काही काळ ठेवण्यात आलेत नंतर ते वेगवेगळ्या कॅंटॉनमेंट व सैन्य संस्थांमध्ये युद्धाचे स्मारक म्हणून ठेवण्यात आले आहेत.
१० सप्टेंबर, इ.स. १९६५ला,भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सुमारे ९७ रणगाडे ताब्यात घेतलेत.[3] या युद्धात ६ पाकी रेजिमेंटींनी भाग घेतला. नावानुसार-१९ लान्सर्स(पॅटन), १२ पायदळ, एम-२४ चॅफी, २४ कॅव्हॅलरी (पॅटन), ४ कॅव्हॅलरी (पॅटन), १६ घोडदळ(पॅटन) व ६ लान्सर्स (पॅटन).
भारतीय सैन्यात त्या दिवशी ३ सशस्त्र रेजिमेंटींसह वेगवेगळ्या प्रकारच्या रणगाड्यांचा समावेश होता. डेक्कन हॉर्स, शेरमन, सेंचुरियन व ए एम् एक्स-१३. ते युद्ध येवढे भयानक व टोकाचे होते, की त्यात भारतीय सैन्याने सुमारे ९७ रणगाडे उद्ध्वस्त वा सुस्थितीत ताब्यात घेतले. यांत ७२ पॅटन टॅंक होते, तर २५ शेरमन व चॅफी रणगाडे. यांपैकी ३२ रणगाडे हे चालू स्थितीत होते. भारतीय सैन्याने ३२ रणगाडे गमवले. यांपैकी १५ रणगाडे पाक सैन्याने ताब्यात घेतले. ते बहुतेक सर्व शेरमन रणगाडे होते.
इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार खेमकरणाची लोकसंख्या ११,९४० आहे.[4]तेथील साक्षरता दर ४७% आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.