हेमचंद्र विक्रमादित्य
शके १५व्या शतकातला उत्तर भारतातला हिंदू सम्राट / From Wikipedia, the free encyclopedia
हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ हेमचंद्र भार्गव (इ.स. १५०१ - इ.स. १५५६) हा इ.स.च्या १६ व्या शतकातील उत्तर भारतातला एकमेव हिंदू सम्राट होता. तो राजस्थानतल्या अलवार जिल्ह्यामधील एका लहान गावातील एक मीठ विक्रेता म्हणून बणजारा जीवनाला सुरुवात केलेला हेमू, आपल्या कर्तबगारीने सूरी वंशाच्य़ा आदिल शाह सूरीचा सेनापती व प्रधानमंत्री या पदांपर्यंत पोहोचला.
उत्तर हिंदुस्तानात पंजाबपासून बंगालपर्यंत त्याने अफगाण बंडखोर, हुमायूँ व अकबराच्या मुघल फौजा यांच्याशी सुमारे २२ लढाया एकदाही पराभूत न होता जिंकल्या. ऑक्टोबर ७ इ.स. १५५६ साली त्याचा ’सम्राट विक्रमादित्य’ या पदवीसहित दिल्लीच्या सिंहासनावर राज्याभिषेक करण्यात आला. सुमारे ३५० वर्षांनंतर त्याने हिंदू साम्राज्याची थोड्या काळासाठी का होईना, पुनःस्थापना केली. त्याने आपल्या नावाने नाणीही प्रचारात आणली होती. मध्ययुगीन भारताचा नेपोलियन अशीही पदवी त्याला देण्यात येते[ संदर्भ हवा ].
मात्र त्यानंतर लगेचच झालेल्या पानिपतच्या दुसऱ्या लढाईत केवळ दुर्दैवाने अकबराच्या मुघल सैन्याकडून हेमूच्या सैन्याचा पराभव झाला. हेमूला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला[1]. हेमूचे समर्थक व हजारो हिंदूंची कत्तल अकबराच्या मुघल सैन्याकडून करण्यात आली[ संदर्भ हवा ].