![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/53/Jai_Singh_and_Shivaji.jpg/640px-Jai_Singh_and_Shivaji.jpg&w=640&q=50)
पुरंदरचा तह
१६६५ चा पुरंदर किल्ल्याचा वेढा संपवण्याचा करार / From Wikipedia, the free encyclopedia
इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा बन्दोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकण्ठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भाण्डणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी छत्रपती संभाजी भोसले राजांचा जन्म पुरंदरावर झाला. पुरंदरचा तह या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज पश्चिम किनाऱ्यावरील सुरतच्या मुख्य बंदर शहरात दाखल झाले. शहराच्या मोगल राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्यासाठी एक दूत पाठविला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दूताला अटक केली. औरंगजेबाकडून जयसिंग यांच्या नेतृत्वात प्रचंड सैन्याच्या रूपात सूड उगवला. पराभव अपरिहार्य आहे हे समजून छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६५ च्या जूनमध्ये पुरंदर करारावर स्वाक्षरी केली. या कराराच्या अटींनुसार छत्रपती शिवाजी महाराज शरण जाण्यास तयार झाले.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/53/Jai_Singh_and_Shivaji.jpg/640px-Jai_Singh_and_Shivaji.jpg)
शाहिस्तेखानाच्या पराभवाने, सुरतेच्या लुटीने, जसवन्तसिंहाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढत होता.सत्तर हजारांची सेना घेऊन शाहिस्तेखान गेला व तीन बोटे गमावून माघारी आला. दिल्लीसम्राटांची व्यापारपेठ सुरत बघता बघता लुटली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा असाच उद्योग चालू राहिला तर मोगलाई सम्पुष्टात आल्याखेरीज राहणार नाही हे औरंगजेबाने ओळखले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारचा सर्वश्रेष्ठ सरदार निवडला. मिर्झाराजा जयसिंह ऐंशी हजार स्वार, बरोबरी दिलेरखान, पाच हजार पठान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी निघाला. मिर्झाराजांनी पुरंदरला वेढा घातला. दिलेरखानाने वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरू करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरच्या तटबंदीला खिण्डार पडले. मोगल सेनेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदर ही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.
यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
१. अंकोला
२. कर्नाळा
३. कोंढाणा (सिंहगड)
४ कोहोज
५. खिरदुर्ग (सागरगड)
६. तिकोना
७. तुंग
८. नंगगड
९. नरदुर्ग
१०. पळसगड
११. किल्ले पुरन्दर
१२. प्रबळगड - मुरंजन
१३. भण्डारगड
१४. मनरंजन
१५. मानगड
१६. मार्गगड
१७. माहुलीगड
१८. रुद्रमाळ
१९. रोहिडा
२०. लोहगड
२१. वसन्तगड
२२. विसापूर
२३. सोनगड