ओशो
भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक / From Wikipedia, the free encyclopedia
चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून, आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते.
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी १९६० च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला. समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले. लैंगिकतेसंबंधी अधिक उदार वृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय (आणि नंतर आंतरराष्ट्रीय) माध्यमांमध्ये 'सेक्स गुरू' अशी उपाधी मिळाली. सन १९७० मध्ये काही काळासाठी ते मुंबईत थांबले. शिष्य जमविण्यास आणि (नवसंन्यासी) आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास सुरुवात केली. आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले. पुण्यात जाऊन १९७४ मध्ये त्यांनी आश्रम स्थापला. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते.
१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. ऑरेगाॅन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला. वर्षभरात या कम्यूनचा स्थानिक रहिवाशांशी जमिनीवरून कटू वाद उभा राहिला. अनुयायांनी ओशोंना वापरासाठी खरेदी करून दिलेल्या रोल्स-रॉयसही कुप्रसिद्ध ठरल्या. १९८५ मध्ये कम्यूनच्या नेतृत्वाने जैवदहशतवादी हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे ओशोंनी उघड केल्यावर ऑरेगाॅन कम्यून कोसळले. लवकरच ओशोंना अटक झाली आणि देशागमनादरम्यान केलेल्या नियमभंगाचा आरोप त्यांच्यावर लागला. युक्तिवादादरम्यानच्या तडजोडीनुसार ओशोंना अमेरिका सोडावी लागली. एकवीस देशांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि जगभ्रमंतीनंतर ते पुण्यात आले. १९९० मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. आज त्यांचा आश्रम ओशो आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र म्हणून ओळखला जातो. ओशोंच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे. स्थितिशील श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि समाजीकरणामुळे या बाबी दबल्या जातात असे त्यांचे मत होते. पाश्चात्त्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढलेलीच दिसते आहे.