शिवाजी महाराज
मराठी साम्राज्याचे संस्थापक / From Wikipedia, the free encyclopedia
शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.[1] विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.[2]
छत्रपती शिवाजी महाराज | ||
---|---|---|
छत्रपती | ||
छत्रपती शिवाजी महाराज | ||
मराठा साम्राज्य | ||
अधिकारकाळ | ६ जून १६७४ - ३ एप्रिल १६८० | |
अधिकारारोहण | छत्रपती पदाभिषेक | |
राज्याभिषेक | ६ जून १६७४ | |
राज्यव्याप्ती | पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत | |
राजधानी | रायगड | |
पूर्ण नाव | शिवाजीराजे शहाजीराजे भोसले | |
जन्म | १९ फेब्रुवारी १६३० | |
शिवनेरी किल्ला, महाराष्ट्र | ||
मृत्यू | ३ एप्रिल १६८० | |
रायगड किल्ला, महाराष्ट्र | ||
पेशवे | मोरोपंत पिंगळे | |
उत्तराधिकारी | छत्रपती संभाजीराजे भोसले | |
वडील | शहाजीराजे भोसले | |
आई | जिजाबाई | |
पत्नी | सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, गुणवंतीबाई | |
संतती | छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले, सखूबाई, राणूबाई, अंबिकाबाई, राजकुवरबाई, दीपाबाई, कमळाबाई | |
राजघराणे | भोसले | |
राजब्रीदवाक्य | 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' | |
चलन | होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन)
|
आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले.[3] शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली.
प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.[4] भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.[5]
शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य-राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत.[6] शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो.[7]